स्नेहसंमेलनातून समाजभान; सत्काराला नकार, सामाजिक भानाला होकार ; के.जे.एस ९५ - ९६ बॅचचा वेगळा निर्णय.



प्रतिनिधी:- मोहन जाधव.


कोपरगाव :- अतिरिक्त खर्च टाळत अनाथाश्रमास देणगी देऊन कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या १९९५/ ९६ बॅचचे स्नेहसंमेलन हे केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणारे न राहता सामाजिक बांधिलकीचा ठळक संदेश देणारे ठरले. 

    या स्नेहसंमेलनात अनाथ व गरजू बालकांच्या शिक्षण व संगोपनासाठी कार्यरत असलेल्या शिर्डी येथील ‘साई सावली बालपरिवार’ या सामाजिक संस्थेला आर्थिक मदत देण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी सत्कारासाठी होणारा खर्च थेट सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. आजच्या काळात स्नेहसंमेलन म्हणजे सत्कार, फुलांचा वर्षाव आणि डामडौल अशी ओळख निर्माण झाली असताना, या बॅचने जाणीवपूर्वक त्याला फाटा देत वेगळा आदर्श घालून दिला. दीर्घकाळानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी ओळखपरेड, मैत्री, आपुलकी आणि परस्पर सन्मान यांचा अनुभव घेत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी जुना काळ आठवणींतून जिवंत केला; मात्र आनंदापुरतेच मर्यादित न राहता समाजाप्रती असलेली जबाबदारीही त्यांनी अधोरेखित केली. कार्यक्रमात कोणताही दिखाऊपणा न ठेवता साधेपणा आणि सामाजिक जाणीव यांना प्राधान्य देण्यात आले. मैत्री जपतानाच समाजाशी नाते घट्ट करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा संकल्प अनेक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.

  स्नेहसंमेलनास नाशिक, अहिल्यादेवी नगर, पुणे, मुंबई तसेच महाराष्ट्र भरातून माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. स्नेहसंमेलनात दिवंगत झालेले माजी विद्यार्थी, शिक्षक तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजीराव गवारे, भारत जपे, विनोद दादा नाईकवाडे, राजेंद्र काशीद, राहुल रोहमारे आदींनी प्रयत्न केले.


No comments:

Post a Comment