शिरूर येथे उत्साहात साजरा झाला एस.टी.चा ७७ वा वर्धापन दिन
गुलाबपुष्प, पेढे, फुलांची सजावट आणि स्वागतसनईच्या सुरांनी नटलेले बसस्थानक..! शिरुरचा एस.टी.च्या प्रवासातील ऐतिहासिक थांबा पुन्हा उजळला; मान्यवरांच्या उपस्थितीत बस पूजन, केक कापून प्रवाश्यांचे गोड स्वागत..!
पुणे जिल्हा प्रतिनिधी – अविनाश घोगरे
शिरूर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन शिरूर बसस्थानकात अतिशय जल्लोषात व भावनिक उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी प्रवाश्यांचे गुलाबपुष्प व पेढे देऊन स्वागत करण्यात आले. बसस्थानक परिसर फुलांच्या सजावटीने आणि आकर्षक रांगोळ्यांनी नटलेला होता, तर स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या आणि गुलाबपाकळ्यांचे उधळण झाले. वातावरणात मंगलसूरांची साथ लाभल्याने संपूर्ण बसस्थानक उत्सवमय बनले होते.शिरूर हे एस.टी.च्या ऐतिहासिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून, १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर (त्या वेळी अहिल्यानगर) दरम्यान धावलेल्या पहिल्या एस.टी. बसचा पहिला थांबा शिरूर बसस्थानक होता. या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे शिरूरमध्ये या दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वर्धापन दिनानिमित्त शिरूर ते कुर्ला (नेहरूनगर) या मार्गावरील एस.टी. बसेसना फुलांनी सजवले गेले. बसस्थानकावर सुंदर रांगोळ्यांनी स्वागत द्वार बनवण्यात आले. प्रमुख बसचे पूजन ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर व आगार व्यवस्थापिका मनिषा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमास शिरूर प्रवाशी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे, बसस्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बोरा, एस.टी. कामगार संघटनेचे माधव मुंडे, बापू जगताप, कुंदन कांडेकर, समीर झगडे, अमोल साळुंखे, गणपती विभुते आदी मान्यवर उपस्थित होते.
बस पूजनानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला. हा केक प्रवाश्यांनाही वाटण्यात आला, तसेच पेढ्यांनी सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.यावेळी आगार प्रमुख मनिषा गायकवाड यांनी प्रवाश्यांचे स्वागत करत एस.टी. महामंडळात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी एस.टी.ची ग्रामीण भागातील महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.
यावेळी प्रा. सतीश धुमाळ यांनी एस.टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असून, तिचे अस्तित्व टिकणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण, सामान्यांचे दैनंदिन प्रवास, सुरक्षिततेची हमी हे सर्व एस.टी.नेच दिले असल्याने ही सेवा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे, तसेच कोरोना काळानंतर कमी झालेल्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन माधव मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बसस्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी केले.एस.टी.चा हा ७७ वा वर्धापन दिन फक्त एक सोहळा नव्हता, तर शिरूरच्या लोकांनी आपल्या सेवाभावाने एस.टी.बद्दल असलेले प्रेम आणि आदर भावनिक पद्धतीने व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूरच्या ऐतिहासिक वारशाचेही स्मरण झाले.
No comments:
Post a Comment