ब्राह्मण गल्लीतील महिलांचा स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी आक्रमक पवित्रा



मागण्या तातडीने न मानल्यास नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा


प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी 

कळमनुरी शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या महिलांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नांकडे नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर आले आहे. ब्राह्मण गल्ली परिसरात सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून तोही अवेळी होत असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. घरगुती कामकाज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि कुटुंबीयांच्या दैनंदिन गरजा भागवताना महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नियमित पाणीकर भरूनही महिन्यातून केवळ दोन ते तीन वेळाच पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सकाळी ७ ते ९ या निश्चित वेळेत तसेच किमान दोन दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी महिलांनी निवेदनातून केली आहे. पाणीटंचाईसोबतच परिसरातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. ब्राह्मण गल्लीतील नाल्या तुडुंब भरल्या असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. कचरागाडी नियमित येत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती महिलांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आठवड्यातून किमान एकदा नाल्यांची साफसफाई करावी, दररोज कचरागाडीची सेवा उपलब्ध करून द्यावी तसेच परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या मूलभूत प्रश्नांकडे नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलांनी केला आहे. महिलांच्या या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

सदर निवेदनावर उषा कावडे, कविता कावडे, श्रद्धा देशपांडे, शारदा घोलप, लीला कस्तुरे, गौरी कस्तुरे, शिवानी, माधुरी कुलकर्णी, गीता कावडे, मालती दिवाळकर, वैशाली कावडे, मंजू पांडे, वैशाली लाखकर, रेणुका जोशी, नंदा देशमुख, रजनी अग्रवाल, नालिनी दिवाकर, दिपाली यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



No comments:

Post a Comment