निवासी आश्रम शाळा व वसतिगृहांमध्ये मध्ये बनावट विद्यार्थी संख्या दाखवून शासकीय निधीवर वर्षानुवर्षे डल्ला.
सहायक संचालक तथा आश्रम शाळा प्रशासनाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी.
(तालुका प्रतिनिधी)-मानोरा-
तालुक्यातील इंगलवाडी येथील सुधाकर नाईक प्राथमिक आश्रम शाळा व वसतीगृहात बोगस विद्यार्थी दाखवून शासकीय निधीचा अपहार होत असल्याची गंभीर तक्रार इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.माजी सरपंच गजानन दशरथ नाईक, रा. आजगांव यांनी दि. ११/०४/२०२६ रोजी संचालकांना लेखी तक्रार दिली आहे.
बोगस पटसंख्या: शाळेच्या हजेरी पटावर दाखवलेली विद्यार्थी संख्या प्रत्यक्षात नाही. अचानक भेट दिल्यास पटावरील विद्यार्थी सापडत नाहीत.
वसतीगृह रिकामे: सायंकाळी ६ नंतर वसतीगृहात पुरेसे विद्यार्थी, कर्मचारी किंवा अधीक्षक उपस्थित नसतात.
खोटी बिले:-विद्यार्थ्यांच्या जेवणावळी व सोयीसुविधांची बिले मात्र दरमहा काढली जातात.
वरिष्ठांचा सहभाग: सहायक संचालक दिपाजी हेरोळे मॅडम ए.सी. कार्यालयात बसून मुख्याध्यापक व सचिवांना बोलावून रेकॉर्डवर व्हीजीटच्या सह्या घेत असल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने म्हटले आहे की, वाशिम जिल्ह्यातील बहुजन कल्याण विभाग व त्याअंतर्गत आश्रम शाळा व वसतीगृहे भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचारी व संस्थाचालकांचे मुक्त कुरण झाली आहेत. हा विभाग फक्त भ्रष्टाचाऱ्यांना मुक्तहस्ताने शासकीय निधी उकळण्याचा अड्डा बनला आहे.
मागणी काय:
बोगस संस्था चालकांची यापुढील बिले अदा करण्यापूर्वी सर्व बाबींची तक्रार कर्त्यासमक्ष तपासणी करावी. बिले अदा केली असल्यास त्यांची संपूर्ण रक्कम परत बोलावण्याची तजवीज करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे वाशिम जिल्ह्यातील आश्रम शाळांमधील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संचालनालय या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment