इतिहासात पहिल्यांदा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण याचा निर्णय पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार मुंबईत ठरणार संभाजीनगर जि.प. अध्यक्षपद, महायुतीत राजकीय पेच कायम



दैनिक दर्पण वृत्तसेवा वृत्त प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीत राजकीय पेच निर्माण झाला असून अंतिम निर्णय मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. अडीच वर्षांच्या सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यात पहिल्या टर्मचे अध्यक्षपद कोणाला मिळणार यावर भाजप आणि शिंदेसेनेत अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील चर्चांपेक्षा राज्यस्तरावर निर्णय होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, सदस्य फुटू नयेत आणि ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलू नयेत यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि उद्धवसेनेने आपल्या सदस्यांना शहराबाहेर सहलीवर पाठवले आहे. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

बुधवारी होणाऱ्या विशेष सभेत नामनिर्देशन प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान होणार असून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांसाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे. महायुतीकडे संख्याबळ असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

संख्याबळाच्या राजकारणामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता असून मुंबईतील बैठकीकडे जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे. 

No comments:

Post a Comment