जेऊर ग्रामपंचायत इमारत नारायण पाटलांची खाजगी मालमत्ता आहे काय? : विवेक येवले
करमाळा(प्रतिनिधी) - जितेंद्र चांदगुडे
जेऊर ग्रामपंचायत इमारत ही विद्यमान आमदार नारायण पाटील यांची खाजगी मालमत्ता आहे काय,गेली कित्येक वर्षे या मूळ इमारतीचा उपयोग हा त्यांची खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे केला जातो आहे हे प्रशासनाच्या ध्यानात येत नाही का ? असा सवाल ज्येष्ठ पत्रकार तथा माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे यांचे खंदे समर्थक विवेक येवले यांनी उपस्थित केला आहे.
जेऊरलगत असलेल्या लव्हे गावचे रहिवाशी असलेल्या पाटील यांनी जेऊर या व्यापारी गावात मसल पॉवरच्या बळावर घुसखोरी करून १९९१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते सरपंच झाले आणि तिथपासून ही ग्रामपंचायत त्यांची खाजगी मालमत्ता झालेली आहे.पुढील काळात तालुक्यातील तत्कालीन प्रस्थापित सर्वच नेत्यांनी तसेच मोहिते - पाटलांनी सोयीनुसार त्यांना राजकीय बळ दिल्यामुळे १९९९,२००९ ला विधानसभा निवडणूक लढविलेले पाटील हे २०१४ ला अवघ्या २५७ मतांनी सेनेकडून तर २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस श.प.कडून पुन्हा आमदार झाले.असो,त्यांचा राजकीय प्रवास काहीही असला तरी त्यांनी जेऊर ग्रामपंचायत इमारत ही आपले संपर्क कार्यालय,ए.सी.चेंबर आदी सर्व सुविधा करुन तिच्यावर कब्जा केलेला आहे.आणि केवळ त्यांच्या सोयीसाठी आवारात नवीन इमारत बांधून ग्रामपंचायत व ग्रामसेवक कार्यालय हे तिथं गेल्या अनेक वर्षांपासून स्थलांतरित केलेलं आहे.
यात सर्वात गमतीचा भाग म्हणजे या पाटलांना ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मालकीच्या इमारतीचा खुलेआम वापर करताना कुठल्याही निवडणुकीची आचासंहिता लागू होत नाही.अगदी जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून थेट आमदारकी,खासदारकी, जि.प.,पं.स.अशा कुठल्याही निवडणुका असल्या तरी आ.पाटील हे खुलेआम याच इमारतीत बसून निवडणुकांची सूत्रे हलवत असतात आणि हे जगजाहीर असून,प्रशासनाला ठावूक असून प्रशासनच जर मूक - बधीर अवस्थेत बघ्याची भूमिका घेत असेल तर मग करमाळा तालुक्यात "लालू राज" सुरू आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे.विशेष म्हणजे हे आमदार महोदय त्याचं कार्यालयात बसून विविध विभागांच्या अधिकाऱ्याना,कर्मचाऱ्यांना बोलावून आढावा बैठका घेतात आणि अधिकारीदेखील नंदीबैलासारखे मान हलवायला हजर राहतात हे खरं तर या मतदारसंघाचे दुर्दैव म्हणावे लागेल.निदान यापुढे तरी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक आदी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन जेऊर ग्रामपंचायतीची इमारत आ.पाटील यांच्या कब्जातून कायमची मुक्त करावी,अशी अपेक्षा यावेळी बोलताना येवले यांनी व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment