शिरूरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन; जीवनपट पुस्तिकांचे वाटप, जयघोषाने परिसर दुमदुमला..!"
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अविनाश घोगरे
शिरूर “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नव्हते, तर अखिल समाजाच्या कल्याणासाठी होते. स्त्रीशक्तीच्या बळकटीसह सामाजिक समतेचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केले.
शनिवारी, शिरूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्तंभाजवळ अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या हस्ते विधीवत पूजन झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व इतर मान्यवरांनी अहिल्यादेवींना पुष्पहार अर्पण केला. यावेळी फुलं व भंडारा उधळून जयजयकार करण्यात आला. अहिल्यादेवींच्या जीवनपटावर आधारित एक हजार पुस्तिकांचे वाटपही यावेळी करण्यात आले.
सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शहराध्यक्ष शरद कालेवार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राहुल रणदिवे, उपाध्यक्ष अजित इटनर, राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सागर गोरे, शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रमोद महाराज जोशी, श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळपे, माजी सदस्य रामभाऊ कदम, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष किरण बनकर, भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रेश्मा शेख, लोकजागृतीचे संघटक रवींद्र धनक, तर्डोबावाडीचे सरपंच जगदिश पाचर्णे, उपसरपंच अमोल देवकाते, गोलेगावचे सरपंच राजेंद्र कटके, युवा नेते सागर नरवडे, भाजपचे शहर सरचिटणीस अविनाश जाधव, शहर उपाध्यक्ष नीलेश नवले, सहचिटणीस विजय नरके, नगरसेवक संदीप गायकवाड, खुशाल गाडे, संभाजी रणदिवे, अक्षय जाधव, अनघा पाठकजी, रावसाहेब गडदरे, प्रा. सुभाष कोळपे, मनिषा जाधव, सुनिता वाखारे, कृष्णा गुलदगड, गजानन कऱ्हे, यशराज कऱ्हाडे, राजेंद्र पुणेकर, सागर सारंगधर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापुरुषांना एका विशिष्ट जातीत मर्यादित करणे ही संकुचित विचारसरणी असून, त्यांच्या कार्याची व्यापकता समाजाच्या सर्व स्तरांसाठी प्रेरणादायक आहे, असे सांगून ढोले पुढे म्हणाले, “अहिल्यादेवींनी अनेक संकटांवर मात करत एकटीच्या जोरावर उत्तम आणि सक्षम प्रशासन उभे केले. त्यांच्या शासनकाळात प्रशासकीय सुधारणांबरोबरच सामान्य जनतेच्या कल्याणावर विशेष भर होता. त्यांनी सुराज्याच्या संकल्पना राबवत आदर्श राज्यकारभाराची पायाभरणी केली.”
या प्रसंगी प्रमोद महाराज जोशी यांनी अहिल्यादेवींनी घडवलेल्या प्रशासकीय, सामाजिक व धार्मिक योगदानाचा, तसेच महिला सक्षमीकरणातील कार्याचा सविस्तर आढावा आपल्या भाषणात घेतला. कार्यक्रमाचे निमंत्रक व रासपचे तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक प्रा. गोरक्ष डुबे यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश अवचिते यांनी तर आभारप्रदर्शन आशिष भोजने यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता अभिवादन, जीवनपट पुस्तिका वितरण व जयघोषाने उत्साही वातावरणात झाली.
No comments:
Post a Comment