शिरूर शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद – निर्बिजीकरण मोहिमेतील अपयशावर चौकशीची- मनसेची मागणी..!
पुणे जिल्हा प्रतिनिधी:- अविनाश घोगरे
शिरूर नगरपरिषद हद्दीत भटक्या व मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत असून नागरिकांचा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेषतः गुजरमळा परिसरातील नागरिकांना या कुत्र्यांच्या दहशतीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही नागरिकांना जखमी होऊन ‘क्वारंटाईन’ होण्याची वेळ आली आहे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे.
“शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे या समस्येची गांभीर्याने नोंद घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
शिरूर नगरपरिषदेकडून सांगण्यात येते की, २०१७ कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना अँटी-रेबिज लस देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी उघड्यावर अन्नपदार्थ आणि कचरा टाकू नये, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात नगरपरिषदेची ही मोहीम प्रभावी ठरताना दिसत नाही.
स्वच्छता निरीक्षकांनी गुजरमळा परिसरातील फक्त दोन कुत्र्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते पकडता आले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. प्रश्न असा आहे की, संपूर्ण शहरात फक्त दोनच कुत्रे आहेत का? इतर भागातील भटकी कुत्री कुठे आहेत? नगरपरिषदेने संपूर्ण शहराचा आढावा न घेता फक्त एका भागापुरती माहिती देणे म्हणजे वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न नाही का?
शहरातील नागरिकांच्या मते, नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी फक्त एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून, कुणीही प्रत्यक्षात ठोस कारवाई करत नाही. मुख्याधिकारी व स्वच्छता निरीक्षक केवळ 'केबिनमध्ये बसून' अहवाल पाठवतात, पण त्या अहवालात वास्तव प्रतिबिंबित होत नाही. नागरिकांना असा सवाल आहे की, भटक्या कुत्र्यांबाबत सादर होणारे अहवाल फक्त 'कुत्रे सापडले नाहीत' इतक्यावरच मर्यादित असतील तर ही मोहीम केवळ कागदोपत्रीच आहे का?
यासोबतच नागरिकांच्या मनात असा संशय निर्माण झाला आहे की, केवळ दोन कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले असतानाही चार आकडी बिल काढल्याचे निदर्शनास आले आहे. कर भरूनही नगरपरिषदेची सेवा अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. घरटी कर घेत असतानाही उघड्यावर कचरा साचतो, तो उचलला जात नाही, व त्यावर नागरिकांना उपदेश केला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, शहराध्यक्ष आदित्य मैड व शहर सचिव रवी लेंडे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, शिरूर नगरपरिषदेने राबवलेल्या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मोहिमेची तात्काळ चौकशी करण्यात यावी. तसेच, या मोहिमेतील खर्च, कामाची पारदर्शकता, अहवाल आणि प्रत्यक्ष कृती यांचा तपशीलवार आढावा घेण्यात यावा.
शहराच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
No comments:
Post a Comment