बोगस बियाणे बनले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवाचे घोर
![]() |
| *फोटो कॅप्शन:* गिर्डा शिवारातील शेतात. दोन एकरात पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने हताशपणे बसले नुकसानग्रस्त शेतकरी राजेश सिताराम राठोड. |
*खापरदरी येथील शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान; कृषी विभागाकडून पंचनाम्याची मागणी*
*मानोरा:* तालुक्यातील खापरदरी येथील शेतकरी राजेश सिताराम राठोड यांनी गिर्डा शिवारातील दोन एकर शेतात मानोरा शहरातील व्यंकटेश कृषी भंडारातून खरेदी केलेले सोयाबीनचे बियाणे पेरले. मात्र आठवठा उलटूनही एकही रोप उगवले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बियाणे बोगस असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
मशागत, पेरणी, खत व बियाण्यावर मोठा खर्च करूनही पीक उगवलेच नसल्याने राजेश राठोड यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अस्मानी संकटासोबतच बोगस बियाण्याच्या ‘सुलतानी’ संकटालाही तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बियाणे विक्रेता व संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राजेश राठोड यांनी केली आहे.
कृषी विभागाने तातडीने शेताचा पंचनामा करून बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
*बनावट बियाण्यामुळे तालुक्यातील केवळ एका गावातील शेतकऱ्याचे खरीप हंगामातील नुकसान झाले नसून हा प्रकार तालुक्यातील असंख्य गावातील शेतकऱ्यांसोबत घडलेला असल्याने जिल्हा प्रशासनाने बाधित व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेणे गरजेचे आहे.- एड.श्रीकृष्ण कल्याण राठोड (अमरगड) वाईगौळ.

No comments:
Post a Comment